

कणकवली | अनिकेत उचले – ता. १९ : आज समाजात आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील गतिमानता कमी झालेली आहे. आर्थिक विषमतेची दरी प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे. मानवाच्या संपूर्ण विकासासाठी सर्वांना समान संधी मिळणे महत्त्वाचे असते त्याकरिता सामाजिक शास्त्रे आणि समाज माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते. सकारात्मक विचार शैलीनेच सामाजिक प्रगती साधते असे प्रतिपादन अमेरिकेतील मिसुरी विद्यापीठातील जेष्ठ समाजशास्त्रज्ञा डॉ. मेरी सायमन लुशी यांनी केले.
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात सामाजिक शास्त्र विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसीय ऑनलाईन परिषदेत त्या बोलत होत्या.
‘सामाजिक शास्त्रातील नविन अभ्यास प्रवाह’या विषयावरील परिषदेत उद्घाटकीय सत्रात बोलताना मेरी सायमन लुशी यांनी सामाजिक शास्त्रातील चार महत्त्वाच्या पैलूंचा सविस्तर आढावा घेतला. सामाजिक शास्त्रे व सामाजिक घटक सामाजिक मानसिकता तयार करण्याचे काम करत असतात. समाजातील प्रत्येक घटकाचा समान विकास झाल्याशिवाय कोणत्याही समाजाचे सामाजिक सक्षमीकरण शक्य होत नाही म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. निश्चित आणि व्यापक उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून गतीने व सामुहिकपणे काम करण्याची आवश्यकता असते.सामूहिक जागृती आणि पर्यावरण पूरक जगण्याची शैली आत्मसात केली तर कोरोणा सारख्या महामारीलाही आपण
सक्षमपणे थोपवु शकतो.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाईसाहेब खोत, चेअरमन पी.डी.कामत, सचिव विजयकुमार वळंजू यांनी शुभेच्छा दिल्या.